शेअर मार्केट मध्ये शेअर्स खरेदी विक्री व्यतिरिक्त इतरही अनेक रंजक घडामोडी घडतात. इतिहासाच्या पोटात डोकावले म्हणजे असे अनेक रंजक किस्से आपल्या हाती लागतात. एकदा कलकत्त्याच्या शेअर मार्केट दलालांच्या एका टोळीने रिलायन्स कंपनीला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला होता. तो आपल्या निर्णय क्षमतेने आणि हिमतीने धिरूभाई अंबानींनी कसं हाणून पाडला याचा इतिहास मनोरंजक आहे. हा लेख रिलायन्स कंपनीचे चेअरमन धीरूभाई अंबानी आणि काही शेअर ब्रोकर्स यांच्यातील डावपेचांचे युद्ध याशी संबंधित आहे. या लेखाची मजा घेण्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट संबंधीची किमान जुजबी माहिती आहे असे गृहीत धरलेले आहे
रिलायन्स इंडस्ट्रीज सुरूवाती पासूनच शेअर होल्डर च्या आवडत्या शेअर्स पैकी एक आहे. रिलायन्स 1977 साली शेअर मार्केट मध्ये सूची बद्ध झाला. या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्यांना कंपनीने कधी निराश केले नाही. काळाच्या ओघात हा शेअर वाढला आणि बहरलेला आहे.
रिलायन्स कंपनी सुरुवातीच्या काळात आपले सर्व भांडवल बहुतांशी कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (convertible debentures) च्या माध्यमातून उभे करत असे. कन्व्हर्टिबल डिबेंचर्स म्हणजेच कर्ज रोखे. आता हे काय प्रकरण आहे ते थोडक्यात सांगतो. कंपन्यांना भांडवल उभे करायचे असल्यास कंपन्या बँकांकडून कर्ज घेण्याच्या ऐवजी शेअर बाजारातून कर्ज उभे करतात. त्यांना डिबेंचर्स असे म्हणतात (मराठीत कर्ज रोखे). यामध्ये कन्व्हर्टिबल डिबेंचर्स असाही एक प्रकार आहे. म्हणजे काय? तर कंपनीला विशिष्ट मुदती पुरते तुम्ही काही पैसे कर्जावू म्हणून देणार. त्या बदल्यांमध्ये कंपनी तुम्हाला काही एक स्थिर व्याजदर देणार. मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात. काही कंपन्या पैसे परत करण्याऐवजी त्या कंपनीचे शेअर्स ऑफर करतात यालाच कन्व्हर्टिबल डिबेंचर्स असे म्हणतात.
कन्व्हर्टिबल डिबेंचर्स कर्ज रोखे म्हणजे काय हे सविस्तरपणे जाणून घ्यायचे असेल तर या निळ्या लिंक वर क्लिक करा.
ई. स. 1982 सालच्या मार्च महिन्यात रिलायन्स ने अशाच एक कन्व्हर्टिबल डिबेंचर्स च्या राइटस चे इशू जाहीर केले. कलकत्त्या मध्ये काही Bears म्हणजे मंदीची अभिलाषा बाळगणाऱ्या दलालांचा एक गट (यांना आपण अस्वली दलाल म्हणूयात) नेमका रिलायन्स ला अडचणीत आणण्यासाठी सापळा रचत होते. रिलायन्स ने त्यावेळी आपल्या शेअरच्या किमती कृत्रिम पद्धतीने एका विशिष्ट पातळीवर स्थिर ठेवलेल्या होत्या. जेणेकरून राईट्स च्या इशू मध्ये काही अडचण येऊ नये. कलकत्त्यातील या (ब्रोकर्स) दलालांना याबाबत माहिती होती. या राईट च्या इशू मध्ये अडथळा आणण्यासाठी त्यांनी रिलायन्स च्या शेअर्सचे भाव पाडायला सुरुवात केली. त्यांनी रिलायन्स च्या शेअर ची शॉर्टिंग च्या माध्यमातून धडाकेदार विक्री सुरू केली. कलकत्त्याच्या या ब्रोकर मंडळींनी 18 मार्चला सकाळपासून शेअर विक्रीचा धडाका लावला. या मंडळींनी जवळपास 3,50,000 (साडेतीन लाख) शेअर एका दिवसात शॉर्ट सेल केले. बाजारात शेवटच्या अर्ध्या तासात घबराट पसरली. रिलायन्स च्या शेअर्सची किंमत कोसळली. शेअर 131 रुपयांवरून 121 रुपयांवर आला.
शॉर्ट सेल म्हणजे काय? तर इंट्राडे व्यवहारात तुमच्याकडे उपलब्ध नसलेले शेअर्स तुम्ही चालू किमतीत विकतात. कारण तुम्हाला अपेक्षा असते की दिवसाखेर या शेअर्सचे भाव कोसळतील. आणि अपेक्षेप्रमाणे त्या शेअर्सचे भाव कोसळले म्हणजे कमी किमतीत तो शेअर खरेदी केल्या जातो. Shorting किंवा शॉर्ट सेल म्हणजे काय? हे विस्तृतपणे समजून घेण्यासाठी वरील निळ्या अक्षरांवर क्लिक करा.
एकीकडे शेअर बाजारात भीतीची लाट सुरू झालेली असताना दुसऱ्या बाजूने आश्चर्यकारक गोष्टी घडायला सुरुवात झाली. जसे-जसे हे दलाल शेअर विकू लागले तसे तसे या शेअर्सची खरेदी ही ही जोरात होऊ लागली. पश्चिम आशियामधील अज्ञात अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांनी या शेअर्सची जोरात खरेदी करायला सुरुवात केली. कलकत्त्याच्या दलालांनी जवळपास अकरा लक्ष शेअर्स विकले तर NRI गुंतवणूकदारांनी आठ लक्ष शेअर खरेदी केले. या अज्ञात गुंतवणुकदारांनी जवळपास दहा करोड रुपयांचे रिलायन्स चे शेअर खरेदी केले होते. हे कोण करत होतं हे कळण्यास काही मार्ग नव्हता.
त्याकाळी मुंबई शेअर मार्केट मध्ये उंधा बदला नावाची पद्धती कार्यरत होती. आज शेअर खरेदि-विक्रीचे व्यवहार जसे T+2 (ट्रेडिंग चा दिवस +2) पद्धतीने सेटल होतात. त्याकाळी शेअर खरेदी विक्री व्यवहाराची सेटलमेंट ही दर दुसऱ्या शुक्रवारी होत असे. तर ही उंधा बदला पद्धती काय होती? समाज, जर सेटलमेंट च्या दिवशी शेअर्सची विक्री करणारा शेअर्सची डिलिव्हरी उपलब्ध करून देऊ शकला नाही. तर ज्याने शेअर्स खरेदी केले आहेत तो व्यक्ती विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून प्रति शेअर दंड म्हणून रकमेची मागणी करू शकत असे. त्याला तसा अधिकार होता.
त्या अनिवासी भारतीय गुंतवणूक दाराने 30 एप्रिल रोजी शेअर्सची डिलिव्हरी मागितली. ब्रोकर शेअर ची डिलिव्हरी देण्यात अपयशी झाला तर त्या बदल्यात 25 रुपये प्रति शेअर उंधा बदला मागितला. ही रक्कम खूप मोठी होती
यामुळे कलकत्त्याच्या त्या दलालांचे धाबे दणाणले. एकदा सपाटून मार खाल्ल्यावर परत त्यांनी दुसऱ्यांदा हिंमत केली नाही. परंतु या शेअर्सची डिलिव्हरी कशी द्यायची हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न होता. शेअर मार्केट देखील येणाऱ्या बुधवार पर्यंत बंद ठेवण्यात आले.
आता या शेअर्सची डिलिव्हरी देण्याची जबाबदारी ब्रोकरची असल्यामुळे त्यांना मार्केट मध्ये उपलब्ध असेल त्या किमतीला हे शेअर खरेदी करणे अनिवार्य झाले. त्याप्रमाणे त्यांनी रिलायन्स चे शेअर खरेदी करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे पुढील काही दिवसात या शेअर्सचे भाव 201 रुपयांपर्यंत जाऊन भिडले.
एका माहितीनुसार सुरुवातीला 10 कोटी रुपये ओतून या दलालांकडून शेअर खरेदी करणारा व्यक्ती धीरूभाई अंबानी हेच होते. तसेच नंतर डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी जेव्हा दलाल रिलायन्स चे शेअर खरेदी करत होते तेव्हा त्या दलालांना शेअर विक्री करणारा व्यक्ती देखील दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः धीरूभाई अंबानी होते. आशा प्रकारे स्वतः चेच शेअर कमी किमतीत खरेदी करून (नंतर तेच खरेदी करण्यास मजबूर असलेल्या) त्याच कलकत्त्याच्या दलालांना विकून त्यांनी बक्कळ नफा कमावला.
म्हणजे या दलालांनी रिलायन्स चे शेअर धीरूभाई अंबानी कडून चढ्या भावात खरेदी केले. आणि एकशे पन्नास रुपयांची कॉन्ट्रॅक्ट किंमत पूर्ण करण्यासाठी परत धीरूभाईंनाच विकले. अंबानींनी त्यांच्या कंपनी विरुद्ध उभा राहिलेल्या आशा अस्वली दलालांना एकाच डावात आस्मान दाखवले. वेळ पडली तर कंपनी साठी धडाडीचे निर्णय कसे घ्यावेत आणि हिम्मत कशी दाखवावी याचा वस्तु पाठ धीरूभाईंनी सर्वांसमोर ठेवला. आर्थिक साम्राज्य केवळ उभे करता येऊन भागत नसते तर त्यास टिकवण्यासाठी प्रसंगी धाडसी निर्णय घ्यावे लागतात.